शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

Showing posts with label भावलेल्या कविता. Show all posts
Showing posts with label भावलेल्या कविता. Show all posts

फक्त लढ म्हणा...



विषाणू



ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार
(
शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला
.

out dated झालंय आयुष्य
स्वप्नही
 download होत नाही
संवेदनांना
 'virus' लागलाय
दु
:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत

delete 
झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं

range 
नसलेया mobile सारखे

hang 
झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट

जाती माती जोडणारी

कुठेच नाही
 website

एकविसाव्या शतकातली

पीढी भलतीच
 'cute'
contact list 
वाढत गेली
संवाद झाले
 mute

computer 
च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय

अन
 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय


floppy Disk Drive 
मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही

अन फाटली मनं सांधणारा

internet 
वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत

केवढी मोठी चूक

रक्ताच्या नात्यांनाही

आता लागते 
facebook................

एक होत्या शांताबाई!



डॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०
saleel_kulkarni@yahoo.co.in

शांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी मैत्रीण..
सर्वार्थाने माझ्या ‘आजी’सारख्या असलेल्या शांताबाई तिसऱ्या माणसाला माझी ओळख ‘हा माझा छोटा मित्र’ अशी करून द्यायच्या आणि तेसुद्धा अगदी मनापासून, खरं- खरं! एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मिरवताना मी त्यांना कधीच पाहिले नाही आणि साधेपणासुद्धा असा की तो टोकाचा.. म्हणजे ‘मी किती ग्रेट, बघा कशी साधी’ असा आविर्भाव चुकूनसुद्धा नाही. मला वाटतं की, त्या साधेपणामागे ‘मी कलाकार आहे’, यापेक्षाही ‘मी आस्वादक आहे’ असं मानणं होतं.
त्यांच्याशी गप्पा मारताना गाणी, कविता यापलीकडे जाऊन ‘मी तुला एक सांगते हं’ असं त्या म्हणत. एखादं संस्कृत सुभाषित, तुकारामांचा अभंग, गदिमांचं गीत, कुसुमाग्रजांची वा बहिणाबाईंची एखादी कविता, एखाद्या इंग्रजी कथेमधला उतारा, चुटकुला किंवा एखादा घडलेला प्रसंग.. असं काहीही असे. आणि सांगून झाल्यावर, ‘ए मस्त आहे ना?’ असा हमखास प्रश्न.. म्हणजे स्वत: जे काही सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते सगळ्यांना दिसावं ही निर्मळ भावना.. यातूनच ‘मधुसंचय’सारख्या पुस्तकाची (ज्यात त्यांनी वाचलेलं, ऐकलेलं सारं काही होतं) संकल्पना सुचली असावी.
‘लोलक’ या शांताबाईंच्या कवितेत..
‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून
आणि दिसू लागली माणसं पुन्हा माणसासारखी!’
असं लिहिलं असेल, तरी संवेदनशील आस्वादकाचा हा लोलक त्यांनी स्वत: मात्र फार उत्कटपणे जपला होता, सांभाळला होता. आणि म्हणूनच इतकं विविधरंगी लेखन करताना प्रत्येक वेळी त्यांचा ताजेपणा, निरागसपणा कायम टिकून असावा.
‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ लिहिताना ‘कुणी न मोठे कुणी धाकटे’ ही ओळ त्यांनी नुसती लिहिली नाही, तर त्या स्वत: तसंच मानत आल्या.
‘विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा’ हे बाहुला- बाहुलीच्या लग्नाचं गाणं मला खूप आवडतं, असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या, चल आपण अगदी आजचं असं एक बालगीत करू या! मग मी एक चाल ऐकवली आणि त्यावर काही क्षणात त्यांनी ओळी रचल्या-
कोकीळ म्हणतो काय करावे?
खोकून बसला पार घसा
कुहुकुहुचे सुंदर गाणे
सांगा आता गाऊ कसा?
म्हणे कोंबडा टी.व्ही. बघता
रात्री गेला वेळ कसा
उशिरा उठलो कुकुच्चकुची
हाक कुणा मी देऊ कसा?
एकीकडे हा निरागस भाव आणि दुसरीकडे-
‘दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय?’
असं वास्तव त्या लिहून जातात.
मला सुरातलं विशेष काही कळत नाही असं म्हणता म्हणता चालीवर लिहिलेली ‘जीवलगा, राहिले रे दूर..’, ‘ऋतु हिरवा’, ‘घनरानी’ अशी गाणी ऐकली की लक्षात येते की सुरावटीतून नेमका भाव शोधून शब्दांच्या जागा ओळखणं ही विलक्षण गोष्ट त्यांना साध्य झाली होती.
‘रूपास भाळलो मी’ पासून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘मानते मन एक काही’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’, ‘मागे उभा मंगेश’, ‘काय बाई सांगू’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जय शारदे’ पर्यंत असंख्य लोकप्रिय गीतं ऐकताना आपण रसिक इतके भारावून जातो की मुक्तछंदातल्या विविधरंगी कवितांकडे बघायला उसंतच होत नाही. मात्र हा त्यांच्या बहुगुणी कवित्वावर अन्याय होईल. त्यांच्या ‘एकाकी’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘देवपाट’, ‘झाड’, ‘आडवेळचा पाऊस’, ‘पूर’ या आणि अशा अनेक कविता आहेत, ज्या शांताबाईंचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर आणतात. ‘कवी, गीतकार’ या वादात त्या कधीच अडकल्या नाहीत. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘गीतात जास्त ू१ंऋ३्रल्लॠ किंवा योजनाबद्धता, आखीव- रेखीव बांधणी होते, असं वाटतं का?’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य!’
एकदा मी त्यांना नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकवला
‘ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू..’
त्यांनी पुन्हा पुन्हा तो अभंग ऐकला आणि म्हणाल्या, ‘हे खरे कवी’ त्यांना सुचलं ते इतकं सुंदर आहे आणि त्यात वृत्त मात्रा छंद सगळं कसं नेमकं!’
एकदा अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, ‘आज जाने की जिद ना करो’ ऐकायचंय रे!’
मी पेटी घेऊन गेलो आणि त्यांच्या ऐकण्यातली विविधता बघून चक्रावून गेलो. त्या गुलजार, जावेद अख्तर यांच्याविषयी बोलत होत्या. मध्येच म्हणाल्या, ‘चोली के पिछे क्या है?’ फार छान लिहिलंय, लोक उगाच विपर्यास करतात. त्यांना एका गाण्यातल्या दोन ओळी फार आवडल्या होत्या-
‘जवानी का आलम बडा बेखबर है
दुपट्टे का पल्लू किधर का किधर है
मला म्हणाल्या, ‘मस्त आहे ना!’ ..मी क्रॅक होऊन बघत बसलो!
‘काटा रुते कुणाला’ लिहिताना शांताबाईंनी एक फार सुंदर शब्द लिहिला ‘अबोलणे’..
काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे
माझे ‘अबोलणेही’ विपरीत होत आहे..
मी विचारलं, शांताबाई हा तुमचा शब्द का? तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे!’
एका शनिवार- रविवारी त्या आमच्या घरी मुक्कामाल्या आल्या होत्या. तेव्हा म्हणाल्या, ‘मी आज खूप खूश आहे.. लतादीदींनी माझ्यासाठी परदेशातून आगाथा ख्रिस्तीची नवीन पुस्तकं आणली.’ मंगेशकर कुटुंबीयांविषयी त्यांना एक खास ओढ, आदर होता. हृदयात एक वेगळी जागा कायम जाणवायची. ‘हृदयनाथांनी किती छान छान गाणी केली माझी’, हे त्या सहजतेने बोलायच्या.
एकदा बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, ‘मी नवीन सीडी करतोय. तुमच्या कविता घेऊ? चालेल?’ तर मला म्हणाल्या, ‘नको! मी काहीतरी नवीन लिहिते. नाहीतर मला काहीच केल्यासारखं वाटणार नाही. तू म्हणशील- ही म्हातारी नुसतीच गप्पा मारते.’ त्यावर आम्ही खूप हसलो.
त्यांनी कधीच देव-देव, पूजा-अर्चा असं काही केलेलं नाही. पण ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्रीगणराया’ अशी गाणी लिहिताना त्या निस्सीम गणेशभक्त झाल्या. ‘ही चाल तुरूतरू’, ‘माझे राणी माझे मोगा’ लिहिताना प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली. समुद्र प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच केवळ कल्पनेतून ‘वादळवारं सुटलं’ सारखी गाणी त्यांनी लिहिली. ‘हे शामसुंदर’ किंवा ‘जाईन विचारीत रानफुला’ मधून त्या विरहिणी झाल्या.. खरंच ही गाणी लिहिताना स्वत:ची किती विविध ‘मनं’ त्यांनी कल्पिली असतील!
सोपं, गोड लिहिता लिहिता..
‘मातीची धरती, देह मातीचा वरती
अरे माती जागवू दे मातीचा जिव्हाळा..
अजब सोहळा! माती भिडली आभाळा..’
असं खोल- खोल विचार करायला लावणारं, तर कधी
‘मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ,
मी अज्ञानातून चालत आलो वाट’ अशी विरक्ती.
गोड, निरागस, आस्वादक रसिक शांताबाईंमध्ये खोलवर एक एकाकी, गंभीर, विरक्त विचारवंत मला कायम जाणवला.
शांताबाई त्यांच्या अगदी अलीकडच्या लेखनात म्हणतात.. ‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुणझुणते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांपलीकडं जावंसं वाटतं. एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा दुवा वाटत असे.. आता जाणीव होते की, शब्दाला शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही.. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या दृष्टिकोनातून जगाचा शोध कधी संपेल असं वाटत नाही.’
शांताबाई, मला खात्री आहे की, या क्षणीसुद्धा तुम्ही अवकाशात कुठेतरी बसून प्रसन्न मुद्रेने काही वाचताय, लिहिताय आणि तयारी करताय पुन्हा नव्याने आयुष्याची मैफिल रंगवण्याची.. आम्हा सगळ्यांसाठी.. आमच्या नंतरच्यांसाठी.. आणि त्यांच्याही नंतर येणाऱ्यांसाठी.. आम्ही सारे तुमची वाट बघतोय. शांताबाई! याल ना!

साभार लोकसत्ता

शब्दांवाचुन तुला कळावे

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले

- प्रसाद कुलकर्णी

जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,

स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,

यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||


राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,

स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,

परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,

स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||||


गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,

स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,

तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,

स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेची ।।२।।


मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती

स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते

स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।


हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,

श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!

तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,

तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,

श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||||


जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,

स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,

यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला

मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


सागरा, प्राण तळमळला ...

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू

तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन

विश्र्वसलो या तव वचनी मी

जगद्नुभवयोगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी

येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला

सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी

भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती

गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे

जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे

नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाब ही आता रे

फुलबाग मला, हाय, पारखा झाला

सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा

प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा

भुलविणे व्यर्थ हे आता रे

बहुजिवलग गमते चित्ता रे

तुज सरित्पते जी सरिता रे

तद्विरहाची शपथ घालितो तुजला

सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती

तरि आंग्लभूमिभयभीता रे

अबला न माझी ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे

जो आचमनी एक क्षणी तुज प्याला

सागरा, प्राण तळमळला ...


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

प्रेम म्हणजे काय रे

प्रेम म्हणजे काय रे ऎका प्रसाद कुलकर्णी यांना

गंध

हिरव्याशा गवतात

हळदिवी फुलें,

हलकेंच केसरात

दूध भरूं आले.


उभ्या उभ्या शेतांमधें

सर कोसळली,

केवड्याची सोनफडा

गंधें ओथंबली.


बकुळीच्या आसपास

गंधवती माती,

उस्कटून रानपक्षी

काही शोधिताती.


जोगवा

कवी: आरती प्रभू

मौज प्रकाशन



स्वप्न उद्याचे घेऊन ये

लखलखणारे पुनवचांदणे सर्वांगावर लेऊन ये
तुझ्या मुलायम ओंजळीतुनी स्वप्न उद्याचे घेउन ये

लालकेशरी सुर्यकळीचा भाळावरती लाव टीळा
क्षितिजावरला चंद्र देखणा कुंतलातुनी माळुन ये

दारी माझ्या आल्यावरती प्राजक्ताशी थांब जरा
गंधवादळी बहरामध्ये चिंबचिंबशी न्हाउन ये

घरात माझ्या चैतन्याच्या चार अक्षता टाक गडे
उरात माझ्या सळसळणारी वीज अनामिक होऊन ये

लखलखणारे पुनवचांदणे सर्वांगावर लेऊन ये
तुझ्या मुलायम ओंजळीतुनी स्वप्न उद्याचे घेउन ये


स्वप्न उद्याचे घेऊन ये

कवीः प्रसाद कुलकर्णी

ग्रंथाली


तू शब्दांचा हा नजराणा दिलास हातांमध्ये
शब्द फुलांचा गंधच आता रंध्रां रंध्रांमध्ये

नरेंद्र प्रभू


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व