शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

१४ विद्या ६४ कला



१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्याबद्दल आमच्याकडे सतत विचारणाही होत असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

१४ विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र=१४
१) ऋग्वेद २) यजुर्वेद  ३) सामवेद ४) अथर्ववेद

१) व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२) ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३) निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४) कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५) छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६) शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.

१) न्याय  मीमांसा  पुराणे  धर्मशास्त्र.

६४ कला
१) पानक रस तथा रागासव योजना- मदिरा व पेय तयार करणे.
२) धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३) दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४) आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५) वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६) पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७) वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८) व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९) वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०) शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११) अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२) वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३) बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४) चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५) पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६) आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७) कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८) हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९) प्रहेलिका- कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०) प्रतिमाला- अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१) काव्यसमस्यापूर्ती- अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२) भाषाज्ञान- देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३) चित्रयोग- चित्रे काढून रंगविणे.
२४) कायाकल्प- वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५) माल्यग्रंथ विकल्प- वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६) गंधयुक्ती- सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७) यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८) अत्तर विकल्प- फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९) संपाठय़- दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०) धारण मातृका- स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१) छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२) वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३) मणिभूमिका- भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४) द्यूतक्रीडा- जुगार खेळणे.
३५) पुष्पशकटिका निमित्त ज्ञान- प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६) माल्यग्रथन- वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७) मणिरागज्ञान- रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८) मेषकुक्कुटलावक- युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९) विशेषकच्छेद ज्ञान- कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०) क्रिया विकल्प- वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१) मानसी काव्यक्रिया- शीघ्र कवित्व करणे.
४२) आभूषण भोजन- सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३) केशशेखर पीड ज्ञान- मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४) नृत्यज्ञान- नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५) गीतज्ञान- गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६) तंडुल कुसुमावली विकार- तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७) केशमार्जन कौशल्य- मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८) उत्सादन क्रिया- अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९) कर्णपत्र भंग- पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०) नेपथ्य योग- ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१) उदकघात- जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२) उदकवाद्य- जलतरंग वाजविणे.
५३) शयनरचना- मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४) चित्रकला- नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५) पुष्पास्तरण- फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६) नाटय़अख्यायिका दर्शन- नाटकांत अभिनय करणे.
५७) दशनवसनांगरात- दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८) तुर्ककर्म- चरखा व टकळीने सूत काढणे.
५९) इंद्रजाल- गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०) तक्षणकर्म- लाकडावर कोरीव काम करणे.
६१) अक्षर मुष्टिका कथन- करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२) सूत्र तथा सूचीकर्म- वस्त्राला रफू करणे.
६३) म्लेंछीतकला विकल्प- परकीय भाषा ठाऊक असणे.
६४) रत्नरौप्य परीक्षा- अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

नंदिनी बोपर्डीकर , रविवार १९ सप्टेंबर २०१०
साभार:  लोकसत्ता

मुंबईची चाळ

मुंबईतली ऎशी टक्के माणसं ही अशा तुटपुंज्या जागेतच राहत असतात. सकाळी त्यांचं घर म्ह्णजे धावपळीत पाणी भरायची जागा नळघर असते. नंतर उभ्या घराचं जणू किचन होऊन जातं. दुपारनंतर घराची ही एकुलती एक खोली म्हणजे लिव्हिंगरूम होते. रात्री तीच खोली बेडरूम होते. रंगमंचावर कसे नेपथ्यबदल होत जातात, तसंच घडत राहतं या घरात. तरीही... घराचं नाटक होऊ न देता इथली माणसं गुण्यागोविंदाने, मनःपुर्वक जगत राहतात.    

डॉ. नंदा केशव मेश्राम यांची आत्मकथा
सुमेध वडावाला (रिसबूड)
डिंपल प्रकाशन

मी कुठे झालो ?


मी कसा झालो ?
आचार्य प्र.के. अत्रे
परचुरे प्रकाशन
किंमत : २५० रुपये.


पुणे शहर हे त्या वेळी सासवडहून आम्हाला दिल्लीइतके दूर वाटायचे. माझे एक चुलते होते. त्यांना पुण्याला चांगली नेकरी मिळाली. तेव्हा सर्व तयारी करून पुण्याला जावयाला ते निघाले. त्यांचा गोतावळा फार मोठा होता. पुण्याला ते चालले म्हणजे जणू काही साता समुद्रापलीकडे चालले, या भावनेने त्यांचे पाचपन्नास नातेवाईक घरापासून गावाबाहेरच्या दिवे नाक्यापर्यंत रडत-ओरडत त्यांच्या बैलगाडीमागून चालू लागले. शेवटी अखेरचा निरोप घेताना त्यांच्या आईने तर हृदयभेदक हंबरडा फोडला. त्यामूळे आमचे चुलते इतके हादरून गेले की ते गाडीवानाच्या गळ्याला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. गाडीवानही दुःखाने व्याकूळ होऊन आरोळ्या मारू लागला. गाडीचा बैल तर जागच्या जागी मटकन खाली बसला. अर्थात अशा परिस्थितीत पुढे प्रवास होणे अशक्यच होते. नोकरीसाठी पुण्याला जाण्याचा बेत आमच्या चुलत्यांनी त्या क्षणीच रद्द केला. आणि जन्मभर आपल्या आईपाशी सासवडलाच राहण्याची त्यांनी घेर प्रतिज्ञा केली. त्यांच्या बरोबरीने नोकरीला लागलेले महिना हजार-बाराशे रुपया पर्यंत चढून पाच-पाचशे रुपयांवर पुढे पेंशनीत निघाले. पण आमच्या चुलत्यांनी उभ्या आयुष्यात स्वतःच्या कष्टाने हजार रुपयेदेखील कमावले नासतील. आणि हे कशासाठी ? तर सासवड सोडून अठरा मैलांच्या अंतरावर असलेल्या पुणे नामक शहरी त्यांना जाणे अशक्य झाले म्हणून.     
   

एक होत्या शांताबाई!



डॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०
saleel_kulkarni@yahoo.co.in

शांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी मैत्रीण..
सर्वार्थाने माझ्या ‘आजी’सारख्या असलेल्या शांताबाई तिसऱ्या माणसाला माझी ओळख ‘हा माझा छोटा मित्र’ अशी करून द्यायच्या आणि तेसुद्धा अगदी मनापासून, खरं- खरं! एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मिरवताना मी त्यांना कधीच पाहिले नाही आणि साधेपणासुद्धा असा की तो टोकाचा.. म्हणजे ‘मी किती ग्रेट, बघा कशी साधी’ असा आविर्भाव चुकूनसुद्धा नाही. मला वाटतं की, त्या साधेपणामागे ‘मी कलाकार आहे’, यापेक्षाही ‘मी आस्वादक आहे’ असं मानणं होतं.
त्यांच्याशी गप्पा मारताना गाणी, कविता यापलीकडे जाऊन ‘मी तुला एक सांगते हं’ असं त्या म्हणत. एखादं संस्कृत सुभाषित, तुकारामांचा अभंग, गदिमांचं गीत, कुसुमाग्रजांची वा बहिणाबाईंची एखादी कविता, एखाद्या इंग्रजी कथेमधला उतारा, चुटकुला किंवा एखादा घडलेला प्रसंग.. असं काहीही असे. आणि सांगून झाल्यावर, ‘ए मस्त आहे ना?’ असा हमखास प्रश्न.. म्हणजे स्वत: जे काही सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते सगळ्यांना दिसावं ही निर्मळ भावना.. यातूनच ‘मधुसंचय’सारख्या पुस्तकाची (ज्यात त्यांनी वाचलेलं, ऐकलेलं सारं काही होतं) संकल्पना सुचली असावी.
‘लोलक’ या शांताबाईंच्या कवितेत..
‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून
आणि दिसू लागली माणसं पुन्हा माणसासारखी!’
असं लिहिलं असेल, तरी संवेदनशील आस्वादकाचा हा लोलक त्यांनी स्वत: मात्र फार उत्कटपणे जपला होता, सांभाळला होता. आणि म्हणूनच इतकं विविधरंगी लेखन करताना प्रत्येक वेळी त्यांचा ताजेपणा, निरागसपणा कायम टिकून असावा.
‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ लिहिताना ‘कुणी न मोठे कुणी धाकटे’ ही ओळ त्यांनी नुसती लिहिली नाही, तर त्या स्वत: तसंच मानत आल्या.
‘विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा’ हे बाहुला- बाहुलीच्या लग्नाचं गाणं मला खूप आवडतं, असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या, चल आपण अगदी आजचं असं एक बालगीत करू या! मग मी एक चाल ऐकवली आणि त्यावर काही क्षणात त्यांनी ओळी रचल्या-
कोकीळ म्हणतो काय करावे?
खोकून बसला पार घसा
कुहुकुहुचे सुंदर गाणे
सांगा आता गाऊ कसा?
म्हणे कोंबडा टी.व्ही. बघता
रात्री गेला वेळ कसा
उशिरा उठलो कुकुच्चकुची
हाक कुणा मी देऊ कसा?
एकीकडे हा निरागस भाव आणि दुसरीकडे-
‘दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय?’
असं वास्तव त्या लिहून जातात.
मला सुरातलं विशेष काही कळत नाही असं म्हणता म्हणता चालीवर लिहिलेली ‘जीवलगा, राहिले रे दूर..’, ‘ऋतु हिरवा’, ‘घनरानी’ अशी गाणी ऐकली की लक्षात येते की सुरावटीतून नेमका भाव शोधून शब्दांच्या जागा ओळखणं ही विलक्षण गोष्ट त्यांना साध्य झाली होती.
‘रूपास भाळलो मी’ पासून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘मानते मन एक काही’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’, ‘मागे उभा मंगेश’, ‘काय बाई सांगू’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जय शारदे’ पर्यंत असंख्य लोकप्रिय गीतं ऐकताना आपण रसिक इतके भारावून जातो की मुक्तछंदातल्या विविधरंगी कवितांकडे बघायला उसंतच होत नाही. मात्र हा त्यांच्या बहुगुणी कवित्वावर अन्याय होईल. त्यांच्या ‘एकाकी’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘देवपाट’, ‘झाड’, ‘आडवेळचा पाऊस’, ‘पूर’ या आणि अशा अनेक कविता आहेत, ज्या शांताबाईंचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर आणतात. ‘कवी, गीतकार’ या वादात त्या कधीच अडकल्या नाहीत. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘गीतात जास्त ू१ंऋ३्रल्लॠ किंवा योजनाबद्धता, आखीव- रेखीव बांधणी होते, असं वाटतं का?’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य!’
एकदा मी त्यांना नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकवला
‘ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू..’
त्यांनी पुन्हा पुन्हा तो अभंग ऐकला आणि म्हणाल्या, ‘हे खरे कवी’ त्यांना सुचलं ते इतकं सुंदर आहे आणि त्यात वृत्त मात्रा छंद सगळं कसं नेमकं!’
एकदा अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, ‘आज जाने की जिद ना करो’ ऐकायचंय रे!’
मी पेटी घेऊन गेलो आणि त्यांच्या ऐकण्यातली विविधता बघून चक्रावून गेलो. त्या गुलजार, जावेद अख्तर यांच्याविषयी बोलत होत्या. मध्येच म्हणाल्या, ‘चोली के पिछे क्या है?’ फार छान लिहिलंय, लोक उगाच विपर्यास करतात. त्यांना एका गाण्यातल्या दोन ओळी फार आवडल्या होत्या-
‘जवानी का आलम बडा बेखबर है
दुपट्टे का पल्लू किधर का किधर है
मला म्हणाल्या, ‘मस्त आहे ना!’ ..मी क्रॅक होऊन बघत बसलो!
‘काटा रुते कुणाला’ लिहिताना शांताबाईंनी एक फार सुंदर शब्द लिहिला ‘अबोलणे’..
काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे
माझे ‘अबोलणेही’ विपरीत होत आहे..
मी विचारलं, शांताबाई हा तुमचा शब्द का? तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे!’
एका शनिवार- रविवारी त्या आमच्या घरी मुक्कामाल्या आल्या होत्या. तेव्हा म्हणाल्या, ‘मी आज खूप खूश आहे.. लतादीदींनी माझ्यासाठी परदेशातून आगाथा ख्रिस्तीची नवीन पुस्तकं आणली.’ मंगेशकर कुटुंबीयांविषयी त्यांना एक खास ओढ, आदर होता. हृदयात एक वेगळी जागा कायम जाणवायची. ‘हृदयनाथांनी किती छान छान गाणी केली माझी’, हे त्या सहजतेने बोलायच्या.
एकदा बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, ‘मी नवीन सीडी करतोय. तुमच्या कविता घेऊ? चालेल?’ तर मला म्हणाल्या, ‘नको! मी काहीतरी नवीन लिहिते. नाहीतर मला काहीच केल्यासारखं वाटणार नाही. तू म्हणशील- ही म्हातारी नुसतीच गप्पा मारते.’ त्यावर आम्ही खूप हसलो.
त्यांनी कधीच देव-देव, पूजा-अर्चा असं काही केलेलं नाही. पण ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्रीगणराया’ अशी गाणी लिहिताना त्या निस्सीम गणेशभक्त झाल्या. ‘ही चाल तुरूतरू’, ‘माझे राणी माझे मोगा’ लिहिताना प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली. समुद्र प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच केवळ कल्पनेतून ‘वादळवारं सुटलं’ सारखी गाणी त्यांनी लिहिली. ‘हे शामसुंदर’ किंवा ‘जाईन विचारीत रानफुला’ मधून त्या विरहिणी झाल्या.. खरंच ही गाणी लिहिताना स्वत:ची किती विविध ‘मनं’ त्यांनी कल्पिली असतील!
सोपं, गोड लिहिता लिहिता..
‘मातीची धरती, देह मातीचा वरती
अरे माती जागवू दे मातीचा जिव्हाळा..
अजब सोहळा! माती भिडली आभाळा..’
असं खोल- खोल विचार करायला लावणारं, तर कधी
‘मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ,
मी अज्ञानातून चालत आलो वाट’ अशी विरक्ती.
गोड, निरागस, आस्वादक रसिक शांताबाईंमध्ये खोलवर एक एकाकी, गंभीर, विरक्त विचारवंत मला कायम जाणवला.
शांताबाई त्यांच्या अगदी अलीकडच्या लेखनात म्हणतात.. ‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुणझुणते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांपलीकडं जावंसं वाटतं. एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा दुवा वाटत असे.. आता जाणीव होते की, शब्दाला शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही.. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या दृष्टिकोनातून जगाचा शोध कधी संपेल असं वाटत नाही.’
शांताबाई, मला खात्री आहे की, या क्षणीसुद्धा तुम्ही अवकाशात कुठेतरी बसून प्रसन्न मुद्रेने काही वाचताय, लिहिताय आणि तयारी करताय पुन्हा नव्याने आयुष्याची मैफिल रंगवण्याची.. आम्हा सगळ्यांसाठी.. आमच्या नंतरच्यांसाठी.. आणि त्यांच्याही नंतर येणाऱ्यांसाठी.. आम्ही सारे तुमची वाट बघतोय. शांताबाई! याल ना!

साभार लोकसत्ता

आपण सगळेच मालदिवी आहोत!


बदलते विश्व , बदलता भारत
ज्ञानेश्वर मुळे - रविवार, ७ फेब्रुवारी २०१०
dmulay@hotmail.com
साभार लोकसत्ता



कोपनहागेनमध्ये डिसेंबरात उडालेली पर्यावरणाच्या बदलाची धूळ आता पुन्हा शांत झालेली आहे. ती धूळ जशी अभूतपूर्व होती तशीच त्यानंतरची ही शांतता अभूतपूर्व आहे. पर्यावरणाचं काहीही ज्ञान नसलेल्या पण तरीही प्रिय पृथ्वीच्या भविष्याची धास्ती घेतलेल्या माझ्यासारख्या माणसाला या विषयावर चिंतन करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे. पर्यावरण बदलामुळे असे झाले तसे झाले असे आपण म्हणतो, ते मात्र साफ चुकीचे आहे. मानव बदलहे या सगळ्या समस्येचे मूळ आहे. पर्यावरणाच्या जाणिवेचा शंख फुंकत असताना मानवी जाणिवेपासून आपण किती दूर गेलो आहोत याचा मात्र आपणाला विसर पडला आहे. आपला दृष्टिकोन आणि जीवनशैली दोन्हींमधल्या प्रदूषणात स्वच्छ भविष्याचा विचार करण्याची शक्तीही काही अंशी बधीर झाल्यासारखे वाटते.
मी जिथे राहतो त्या मालदीवचं उदाहरण घेऊ. निसर्गाचा असा वरदहस्त क्वचितच एखाद्या देशावर असतो. अकराशे ब्याण्णव छोटी छोटी बेटं असणारा हा देश, जगाचं वाढतं तापमान व वितळणारे हिमखंड यांच्यामुळं समुद्राची उंची दीड मीटर वाढली तर अख्खा देशच पाण्याखाली जाईल. परवाच्या कोपनहागेन परिषदेच्या वेळी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला संदेश सोपा व सरळ होता. आज संकटाच्या दारात मालदीवियन उभे आहेत, पण खरं तर जगातला प्रत्येक माणूस मालदीवियन आहे, आपण सगळे मालदीवियन आहोतमी जेव्हा जेव्हा समुद्राकडं पाहतो, बेटांची मखमली वाळू मुठीत घेतो, मावळत्या सूर्याच्या पाश्र्वभूमीवर उभी असणारी जहाजं बघतो तेव्हा माझ्या कानात शब्द गुंजतात, ‘आपण सगळे मालदीवियन आहोत’.
प्रथमदर्शी मालदीवची ही बेटं हिंद महासागरात कुणी रत्नंमाणकं विखरलेली नाहीत ना असे वाटत राहते. पण मानवी संस्कृतीच्या प्रगतीनं या देशाच्या पावित्र्याचा भंग केव्हाच केला आहे. मालदीव देशात तीन स्वतंत्र जीवनशैली आढळतात. राजधानी मालेची जीवनशैली, आरामदायी रिसॉर्ट बेटांची जीवनशैली आणि पारंपरिक मालदिवी बेटांची जीवनशैली. पारंपरिक बेटांपैकी जवळजवळ पंधरावीस बेटांना मी भेटी दिल्या आहेत. त्यात राजधानीजवळची बेटं तशी राजधानीपासून शेकडो कि.मी. उत्तर तशीच दक्षिणेला असणारी बेटं मी पाहिलीत. अशी बेटं जवळजवळ दोनशे असून त्यावर फक्त मालदिवी लोकच राहतात. साधे लोक, साधे रस्ते, नारळांची झाडं, चोहोबाजूला सागर, शिक्षण व आरोग्याच्या मुलभूत सुविधा, घरं साधी पण ऐसपैस, प्रार्थनेला एक मशिद, लोकसंख्या फारतर सातआठशे आणि दीड दोन चौ. कि.मी. असं या बहुसंख्य बेटांचं स्वरूप आहे. जगापासून तुटलेलं असलं तरी जीवन शांत व सुंदर आहे. शिवाय प्रत्येकाच्या घरी टी.व्ही., सफाई मशिन, धुलाई यंत्र वगैरे आधुनिक उपकरणं आहेत. नावापुरती शेती आहे. जीवनावश्यक वस्तू राजधानी मालेतून बोटीने आठवडय़ातून एकदा येतात. संध्याकाळच्या वेळी सगळं बेट फुटबॉलच्या मैदानावर किंवा बोटी ये-जा करतात त्या धक्क्यावर जमतं. लोक बाष्फळ गप्पा मारतात किंवा फक्त बसून राहतात. गेली अडीच हजार र्वष ही गावं स्वयंपूर्ण जीवन जगताहेत. त्यांच्या आजुबाजूच्या बेटांशी संपर्क होता, पण जगाशी संबंध सुरू झाला तो केवळ गेल्या तीस-चाळीस वर्षांत. कुणालाही हवंहवंसं वाटावं असं हे जीवन; पण बाह्य जगाचा स्पर्श झाला आणि विकास आणि प्रगतीच्या जखमांनी हळूहळू ही बेटं वेदनाग्रस्त होऊ लागली आहेत.
या बेटांची अवस्था कोकणातल्या गावांसारखी झाली आहे. सगळी कर्ती पिढी राजधानी मालेला जायला निघाली आहे. गावात फक्त स्त्रीया-माणसं आणि प्राथमिक फार तर माध्यमिक शाळेत जाणारी मुलं-मुली. संपूर्ण प्रदूषणमुक्त, स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली, माणसामाणसातल्या नात्यानं संपन्न व परिपूर्ण अशी ही बेटं आता मालेकडं डोळे लावून बसतात. इथल्या जनतेला मालेचीच स्वप्नं पडतात. आपल्या गावातील पवित्र आणि शून्य कार्बन उत्सर्जनाच्या पर्यावरणाऐवजी त्यांना प्रति चौ. कि.मध्ये जगातील सर्वोच्च जन-घनता असलेल्या माले शहरात जाण्याची घाई झाली आहे. प्रगती आणि विकासाच्या आकांक्षांनी त्यांच्या मनाचे पर्यावरण कोसळले आहे.
आता माले या राजधानीच्या शहरातील जीवनशैली बघूया. फक्त तीन चौ. कि. मी.च्या क्षेत्रात जवळजवळ सव्वा ते दीड लाख लोक उभे राहतात. इथे सरकारी इमारती व कार्यालये, शाळा, दवाखाने, खासगी कंपन्यांची कार्यालये, दुकाने, बहुमजली इमारती या व इतर आधुनिक शहरात असणाऱ्या सगळ्या सोयी (व गैरसोयी) आहेत. उंदराच्या बिळांसारखी, माणसांची घरं आहेत, प्रत्येकजण सकाळी उठून कुठंतरी जाण्याच्या घाईत असतो, आपण काहीतरी फार महत्त्वाचे काम करत आहोत अशी त्याची धारणा असते, दुकानांचे दरवाजे उघडतात, बंद होतात, एकाऐवजी पंचवीस-तीस मशिदींमधून बांग ऐकू येते. गर्दीने, माणसांच्या प्रगतीने एकेकाळचे या छोटय़ा बेटाचे निसर्ग-संगीत हिरावून घेतले आहे. इथल्या लोकांना रुपैयाबरोबर डॉलरही कळतो, त्यांना अधिक उर्जेची भूक लागली आहे, घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. जेवण गरमगरम खायला वेळ नाही. त्यामुळे मायक्रोवेव्ह लागतो. या शहराचे दरडोई कार्बन उत्सर्जन भारतातील दरडोई उत्सर्जनापेक्षा कितीतरी अधिक आहे. या छोटय़ा बेटावर जवळजवळ तीस हजार मोटारसायकली आहेत.
या शहराला बेट म्हणावे असे इथे काहीच नाही. इथला एकमेव समुद्रकिनाराही कृत्रिमआहे. आठवडय़ाचे पाच दिवस काम करून इथलाही माणूस कंटाळतो, त्याचा जीव आंबून जातो. तेव्हा तो टाइमपास, शॉपिंग किंवा आराम करण्यासाठी कोलंबो, बेंगलोर किंवा सिंगापूरला जातो किंवा जायची स्वप्नं बघतो. कधी कधी मालदीवमधल्या आरामदायी रिसॉर्ट बेटांवर जायची इच्छा बाळगतो आणि संधी मिळताच तिथं पोहोचतोही.
आहे तरी काय या रिसॉर्ट बेटांवर? हीसुद्धा पारंपरिक मालदिवी बेटांसारखी छोटी छोटी बेटं आहेत. पण तिथं मालदिवी माणसं राहात नाहीत. मालदिवी बेटांमधली जवळजवळ हजारभर बेटं निर्मनुष्य आहेत. त्यातली शंभर बेटं भाडय़ानं दिली आहेत आंतरराष्ट्रीय हॉटेल कंपन्यांना. या कंपन्यांनी या बेटांवरती तुमच्या-आमच्या मनातल्या ऐशोआरामच्या सगळ्या कल्पनांना मूर्त रूप दिलं आहे. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला माणूस सांगतो, ‘सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही जिथं आकाश आणि सागर भेटतात, जिथं असीम सौंदर्य शोधावं लागत नाही ते आसपास घुटमळत असतं, जिथं आपण आनंदमय होऊन जातो तिथं तुझ्यासोबत असावं असं वाटतं.असं अप्रतिम सुंदर विश्व या शंभर बेटांवर निर्माण करण्यात आलं आहे.
पण त्यात एक मेख आहे. तुमचा खिसा खोलअसावा लागतो. किती खोल? एका दिवसाचे (किंवा रात्रीचे) एका शयनगृहाचे भाडे तीस-चाळीस हजार रुपयांपासून पाच-दहा लाख रुपयांपर्यंत. तिथं सामान्य माणूस जाऊ शकत नाही. गंमत म्हणजे या रिसॉॅर्ट बेटांवर आणि मालदीवच्या पारंपरिक बेटांवर निसर्गाचे सगळे रंग, विभ्रम, आविष्कार सारखेच आहेत. फक्त पारंपारिक बेटांवर साधा सोज्ज्वळ बावनकशी आनंद आहे, त्याला ऐशोआरामाची झालर नाही. रिसॉॅर्टवरती जलक्रीडा, शेकडो प्रकारचे मालिश, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, स्नोर्केलिंग वगैरे आनंदाचे अनेक आधुनिक आविष्कार आहेत. पण कुणी कुणाला ओळखत नाही. याउलट पारंपरिक बेटांवर बोलणारी चालणारी एकमेकांशी नातं असणारी, प्रेम तसंच भांडणं करणारी जनता दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळ वस्ती करून आहे. या माणसांचे आणि निसर्गाचे एक गूढ नाते आहे. हे नातेही असेच जन्मोजन्मीचे आहे. ते शिडाच्या बोटी चालवतात, वल्हवतात, पोहतात, मासे पकडतात. निसर्ग त्यांचा अन्नदाता आहे. ते निसर्गावर प्रेम करतात. रिसॉर्ट बेटांवर माणसं पाहुणे बनून येतात, पैशाच्या आकाराप्रमाणे आराम विकत घेतात, व्हिडीओ, फोटो वगैरेंच्या माध्यमातून आठवणी गोळा करतात आणि पुनश्च महानगरातील आपापल्या गुहांमध्ये परततात. पुढच्या वर्षी पुन्हा एन्जॉय’, करायला यायचंच, असा निश्चय करून.
ही माणसं ज्या महानगरांमधून येतात. तिथंही त्यांचं कार्बन योगदान प्रचंड प्रमाणात असतंच. पण या बेटांवर असतांनाही त्यांचा कार्बन उपभोगवाढतो. कारण जितका ऐशोराम अधिक, तितका वीज व इंधन यांचा उपयोग आणि कार्बन उत्सर्जन अधिक. बेटसदृश जीवन जगतानाही उपभोग शैली मात्र महानगरीच. ही माणसं वातावरणाचं तापमान वाढायला, जीवाश्म इंधनाचा उपभोग घेण्यात, हिमालयातील हिमखंड प्रचंड वेगाने वितळवण्यात, जगभरच्या हवामानाचा समतोल बिघडवण्यात सिंहाचा वाटा उचलतात आणि त्यानंतर क्योतोपासून कोपनहागेनपर्यंत हिरवे तंत्रज्ञान’, ‘अपारंपारिक उर्जास्रोतआदी विषयांवर भाषणे देण्यासाठीलाखो रुपये आकारतात.
आपल्याकडेही वेगळ्या अर्थाने गेल्या साठ वर्षांत विकासाच्या नावाखाली लाखो लोकांनी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला. गावातील निसर्गासमवेतच्या निम्न कार्बन उत्सर्जन श्रेणीतून ही लाखो कुटुंबं प्रगती करत उच्च कार्बन उत्सर्जन श्रेणीत आली. मी ही त्यातलाच एक प्रतिनिधी आहे. आमचा सर्वाचा तथाकथित विकास आपणा सर्वाना आश्रय देणाऱ्या पृथ्वीच्या अस्तित्वावर घाला घालत आहे. महात्मा गांधींच्या खेडय़ाकडे चला’, ‘साधे राहाया संदेशातील तथ्य आता शास्त्रज्ञ समजावून सांगताहेत. वीज असो वा इंधन आता अपारंपारिक आणि अक्षय उर्जेशिवाय आपले काम चालणार नाही. यात पाश्चिमात्य जगताने बरोबर पाचर मारून ठेवली आहे. पृथ्वीच्या आणि माणसाच्या शोषणावर आधारित उच्च कार्बन उत्सर्जन जीवनशैली आणि त्याचे समर्थन करणारी अर्निबध भांडवलशाही यांच्या बळावर दोनशे वर्षे जगाला पिळून काढल्यानंतर आणि जागतिक विचारसरणी अधिक उपभोग-अधिक प्रगतीअशा समीकरणावर आणून ठेवल्यानंतर त्यांनी धोक्याची घंटी वाजवायला सुरुवात केली आहे. आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी ते आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान विकून आम्हाला रस्त्यावर काढायला तयार झाले आहेत.
गेल्या दोनशे वर्षांच्या विकासाच्या प्रक्रियेतून अस्वस्थ करणारे काही निष्कर्ष निघतात. त्यातले काही असे :
१) माणूस गावाकडून शहराकडे, शहराकडून महानगराकडे जातो तेव्हा आपली शैली निम्न कार्बन उत्सर्जनाकडून उच्च कार्बन उत्सर्जनाकडे नेत असतो.
२) ग्रामीण व अशिक्षितांच्या तुलनेने शहरी व सुशिक्षित लोक अधिक कार्बन उत्सर्जन करतात आणि म्हणून पर्यावरणाला अपाय करतात.
३) गरीबांच्या तुलनेने श्रीमंत अधिक कार्बन उत्सर्जन आणि पर्यायाने पृथ्वीचे अधिक नुकसान करतात.
विचार करणारे लोक व शास्त्रज्ञ दोघेही कमी उपभोग पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा यांचं महत्त्व सांगताहेत. पण गरीब देशांसाठी याचा अर्थ मुंडासे व लंगोट घालणाऱ्याने शरीरभर कपडे घालू नयेत, सायकलवर बसणाऱ्याने गाडीचे स्वप्न बघू नये असा होतो. शिवाय रिसॉर्टवरच्या जनतेने पारंपरिक बेटांवर आणि महानगरातील लोकांनी गावी जावे असाही होतो. पण गाववाला असल्यामुळे त्यातली एक गोची मला कळते. गावांचा आत्मा नष्ट झाला आहे.
नद्या सुकल्या आहेत. साइनबोर्ड आणि टीव्ही टॉवरनी गावांना उघडे-नागडे करून टाकले आहे आणि उरल्यासुरल्या सौंदर्यावर राजकारण आणि पैशाची हाव या दोन्हींनी बलात्कार केला आहे. मागच्या वर्षी आमच्या गावात आम्ही काही लोकांनी ग्रामपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या कार्यक्रमात एका मोठय़ा पडद्यावर आम्ही गूगलवरती दिसणारी आमच्या गावाची प्रतिमा गावकऱ्यांना दाखवली. आकाशातून घेतलेले ते विहंगमतंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतिक होते. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट त्या चित्रात दिसली ती अशी, संपूर्ण गावात नजरेत भरेल असे एकही झाड नव्हते! चला गावाकडे!

साभार लोकसत्ता

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व